पिंपरी : टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियन यांच्यात मागील १९ महिन्यांपासून प्रलंबित असलेला त्रैवार्षिक वेतनवाढ करार अखेर मंगळवारी करण्यात आला. दरम्यानच्या काळात कामगारांनी केलेल्या आंदोलनानंतर मात्र अतिशय सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली असल्याचे सांगण्यात आले आहे. सुमारे पाच हजार तीनशे कामगारांना या वेतनवाढीचा फायदा होणार आहे.
एक सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीकरिता ८६०० रुपये प्रत्यक्ष वाढही तीन वर्षांच्या टप्प्याटप्प्याने (७२ टक्के, १५ टक्के व १३ टक्के अशी) विभागून, तसेच ८७०० रुपये अप्रत्यक्ष म्हणजे एकूण रुपये १७ हजार ३०० रुपये एवढ्या रकमेचा करार झाला आहे. या व्यतिरिक्त एखादा कामगार कंपनीच्या सेवेत असताना मरण पावला, तर ग्रॅच्युइटीबाबत त्याची २५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर देण्यात येणारे घड्याळ आता कामगाराच्या पती अथवा पत्नीसही देण्यात येईल. याबरोबरच कामगारांच्या इतरही अनेक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अलीकडेच येथील पिंपरी प्रकल्पाला भेट दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखरन हेदेखील या वेळी उपस्थित होते. या भेटीत त्यांनी कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन या समस्येवर लवकरच काहीतरी मार्ग काढण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.